दोन किनारे (भाग -4)

                                         4
                 मानसीकडून आल्यापासून सौरभला फार अस्वस्थ वाटत होत .मानसीकडे खाणं झाल्यामुळे तशी भूक नव्हती आणि इच्छाही नव्हती .किचन मध्ये जाऊन कडक कॉफी केली .कॉफीचा मग घेऊन तो बालकनित बसला .थंड वारा वाहत होता .नेहमी गरम कॉफी आणि बालकनित बसून कॉफीचा आस्वाद घेणे त्याचा आवडता छंद .त्याने आकाशाकडे पहिलं बहुतेक पौर्णिमा असावी .टपोर चांदण पडलं होतं ...थंड हवा अंगाला झोंबत होती पण त्याला आज काहीच आवडत नव्हतं .
                
रोज ओळखीचे वाटणारे आकाशातील चंद्र ,तारे सगळेच त्याला अनोळखी वाटत होते .असं वाटतं होतं आजवर आपल्याला जे  दिसत होतं ते तसं नव्हतंच कदाचित .नेहमी ओळखीचे वाटणारे ,ज्यांना आपण जन्मापासून ओळखतो ते सुद्धा अनोळखी भासत होते .त्यांनाही आपण पूर्णपणे ओळखू शकलो नाही .

राहून राहून राजन काकांचे विचार येत होते .राजनकाका ...आपण ओळखत असलेले राजनकाका...एक हुशार नावाजलेले डॉक्टर ...माझ्या बाबांचा मित्र ...बाबांच्या हॉस्पिटलचे पार्टनर ...की एक बलात्कारी ...धोकेबाज माणूस ...

खरंच कधी कधी माणूस जसा दिसतो तसा नसतो ..सौरभला राजनकाका आठवू लागले .

डॉक्टर राजन देशमुख एक प्रसिद्ध जनरल सर्जन .बाबांची आणि त्यांची मैत्री अगदी कॉलेज जीवनापासूनची ....पक्की मैत्री ...घरी नेहमी येणे जाणे त्यामुळे राजन काका खूप जवळचे वाटायचे .

राजनकाका एक आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी होते .एक नावाजलेले हुशार डॉक्टर ...थोडे महत्वाकांक्षी ...थोडे म्हणण्यापेक्षा जास्तच महत्वाकांक्षी ..

आईबाबाकडून ऐकलं होतं त्यांनी आपलं करिअर मार्गी लागावं म्हणून   आयुष्यात आलेलं प्रेम नाकारून  एका श्रीमंत माणसाच्या मुलीशी लग्न केलं होतं . ते नाकारलेले प्रेम म्हणजे मानसीची आई तर नसेल .सौरभच्या मनात विचार आला.

राजनकाकांची बायको स्मिताकाकू आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती ...दिसायला सुंदर आणि डॉक्टर होती ....

म्हणजे तस तिला डॉक्टर होण्यात खास रस नव्हताच मुळी पण आईवडिलांनी डोनेशन भरून डॉक्टर केलं .समोर मात्र PG वगैरे करण्याच्या भानगडीत स्मिता काकू पडल्या नाही .

डॉक्टर असली तरी तिला प्रॅक्टिस करायची आवड नव्हती .तिला पार्टी ,पब ,यातच रस होता .हवं तस आयुष्य जगावं या विचारांची काकू आणि प्रचंड वास्तववादी विचाराचे राजनकाका .राजनकाकांना यश आणि पैसे कामविण्याची धुंदी चढली होती .

काकांचे सासरे श्रीमंत होते .त्यांना मुलीसाठी काहीतरी करायचं होतं ..आणि बाबांना पण हॉस्पिटल काढायचं होतं पण एकट्याने काढणे शक्य नव्हते .बाबांना पार्टनर हवा होता .असा अचानक योग जुळून आला आणि देशमुख -इमानदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना झाली .

अडमिस्ट्रेशन ची धुरा  आई सांभाळायची ...बाबा आणि काका दिवसरात्र मेहनत करायचे ..स्मिता काकू सुरवातीला काही दिवस यायच्या दवाखान्यात परंतु त्यांना ते बेरंग जीवन आवडत नव्हते .अशातच त्यांना मुलगी झाली ...निधी ...माझ्यापेक्षा सहाएक महिन्याने लहानअसेल .

राजनकाका दिवसरात्र दवाखाण्यात राहत असे म्हणजे राहावच लागे कारण बऱ्याचदा इमर्जन्सी असे .काका घरी स्मिता काकुला वेळ देऊ शकत नव्हते .त्यांचे खटके उडू लागले .

निधीच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून तिला बोर्डिंग ला टाकलं ...

स्मिता काकू आपले मन रामविण्यासाठी आपला वेगळा मार्ग निवडला .ती पब,पार्ट्या मित्रमंडळी यात रमू लागली ...
दोघंही एका घरात राहून वेगवेगळे आयुष्य जगू लागले .निधी आईवडिलांपासून लांबच वाढली .प्रेमाऐवजी तिला भौतिक सुविधा कशा पुरविता येईल आणि कसं आनंदी ठेवता येईल याकडे दोघेही लक्ष देऊ लागले .

सगळ्या इच्छा पूर्ण होत असल्यामुळे निधी पण हट्टी आणि अहंकारी होत होती .

स्मिताकाकू आणि काकांचे अजिबात पटत नव्हते .फक्त मुलीसाठी ते एकत्र राहत होते .एका घरात राहून दोघे स्वतंत्र जीवन जगत होते .स्मिता काकुला हवा असलेला वेळ ,प्रेम ,काका करिअरच्या नादात देऊ शकले नाही .

सुरवातीला कुढत बसलेल्या काकूने वेगळा मार्ग निवडला ...

ती पार्ट्या ,टूर ,मित्र मंडळी यात रमू लागली ...मुलगी मोठी होत होती ...निधीची बारावी झाली आणि काकूंनी कायदेशीर घटस्फोट घेतला . काकांनी बराच मन वळविण्याचा प्रयत्न केला पण काकू आपल्या मतावर ठाम होती .तसही काकू श्रीमंत घरची आणि तिच्या वडिलांच्या पैशावरच काकांचा व्यवसाय सुरू झाला आल्यामुळे काकूंचे पारडे जड होते .
तसा विचार केला तर काकूंचे योग्यही होते ...एकमेकांशी पटत नसताना ,उगीच एकमेकांच्या आयुष्यात लोढा बनण्यापेक्षा विभक्त झालेले बरे .तू तुझं आयुष्य जग मी माझं .

तशीही निधी लहानपणापासून आईबाबांपासून लांबच राहिलेली त्यामुळे तिला आई बाबांच्या विभक्त होण्याचा विशेष फरक पडला नाही .

नंतर असं कानावर आलं की काकूंनी दुसरं लग्न केलंय आणि अमेरिकेत स्थायिक झाली .

निधी काकांकडेच राहिली .आता काकांचे आयुष्य हॉस्पिटल आणि निधी एवढेच होते .
आमचं हॉस्पिटल शहरातील नामांकित हॉस्पिटल होते .काकांना आपला वारसा पुढे चालवावा म्हणून निधीला खाजगी मेडिकल कॉलेज मधून MBBS .MD .केलंय .तिचंही हे अंतिम वर्ष होतं .

आईबाबांना काकांसाठी नेहमी वाईट वाटते .इतक्या हुशार ,होतकरू माणसाला वैवाहिक सुख मिळालं नाही .आयुष्यात आनंद असा मिळालाच नाही .पैसा, प्रसिद्धी सगळं मिळालं पण समाधान मात्र मिळालं नाही .मोठा झाल्यावर मलाही काकांबद्दल वाईट वाटायचं .प्रेमळ,सज्जन ,कष्टाळू काकांना असं जीवन का लाभले? फार वाईट वाटायचं .

पण आता वाटतं मानसीच्या आईचा शाप तर लागला नसेल की खऱ्या प्रेमाची अवहेलना केल्यामुळे आयुष्यात परत प्रेमच मिळालं नसेल ?

का केले काका तुम्ही असे ?तरुणपणी केलेली चूक होती ?की यश मिळविण्याच्या नादात खरं प्रेम विसरून तुम्ही मृगजळाच्या मागे धावले?

काका तुमच्या मनात एकदाही विचार आला नाही की त्या मुलीचं काय झालं असेल?तुम्हाला कधी पश्चाताप झाला नाही भोळ्या भाबड्या मुलीला फसविल्याबद्दल ?
असे अनेक विचार सौरभाच्या मनात थैमान घालत होते .

मनातम्हणाला,"खरंच जसं दिसत तसं नसतं "

थंड वारा अंगाला झोंबत होता .बालकनीतून उठला दार बंद केले.घडाळ्यात पाहिलं अकरा वाजले होते .उद्या सकाळी आठ वाजताची फाईट आहे म्हणजे सकाळी सहा ला निघावं लागेल ..लवकर झोपायला हवं ...

मानसीला फोन करावा का?असा विचार मनात आला ...नको झोपली असेल ..मेसेजच करतो असा विचार करून त्याने मेसेज टाइप केला ...

"आठची फ्लाईट आहे .सहाला घरून निघेल .पोहचल्यावर फोन करेल ..गुड नाईट ..टेक केअर ".

क्रमशः

©अर्चना अनंत धवड


Comments